Thursday, February 24, 2011

मला आता कळायला लागलंय

मला आता कळायला लागलंय......
मी ज्यांना आपलं म्हणत होतोत्यांपासूनच मन आता पळायला लागलंय.

आता नकोसा वाटतो सहवास त्यांचा,
नकोसा वाटतो संग,
मी विसरतो आता कि, तेही कधी होते माझ्या भूतकाळातले अंग,
आनंदाचे रंग,
उत्साहाचे तरंग,
आज सारेच बेरंग, बेचिराख.
ते भेटतात तेव्हा मी हसतो फक्त,
पण त्य भेटीत ती तळमळच नसते जी असायची पूर्वी कधी.
आज त्यांच्या दिशेने पडणारं पाऊल आपसूक दूर दूर वळायला लागलंय.
मला आता कळायला लागलंय.

आता उरलीच नाहीये ती आर्दता,
ती आर्तता,
ती विश्वासाची पात्रता,
आता... आता त्रास होतो ते झरलेले क्षण आठवातांना,
नि मनाची तयारी नसताना पण कोण्या अज्ञात कारणास्तव शरीराला त्यांच्याकढे पाठवताना
जाता जाता उत्साहाच एक एक पण हळू हळू गळायला लागलंय.
मला आता कळायला लागलंय.

मला आवडतात नाती सांभाळायला, गोंजारायला,
त्यांवरती बागडायला, तरंगायला, उडायला,
पण त्यातला आतआतला परकेपणा, खोटेपणा,
यामुळे मला जड झालीयेत हि नाती,
या गाठी,
ज्या मीच बांधल्या होत्या फार दूरच्या क्षणांसाठी,
पण आता वाट्टेल ते कारण सांगून मी निघून येतो तिथनं....
मग त्यांना राग आला तरी चालेल...
उगाच खोटं खोटं हसून मनाला दुखी ठेवण्यापेक्षा एकांतात रडल्याच समाधान तरी भेटेल.
याला माझा पळपुटेपणा म्हणा,
धूर्तपणा म्हणा,
बेफिकिरी म्हणा,
कि म्हणा मला नातीच सांभाळता येत नाहीत,
मला चालेल.....माझा हळवेपणा तुम्हाला कसा कळेल..
हि मनातली तळमळ,
विचारांची खळबळ,
काळजाच्या जखमेची हळहळ तुम्हाला नाही कळणार.
हे सांगतानाही शांत जखमेवरच विस्मरणाच औषधदेखील आता भळभळायला लागलंय.
मला आता कळायला लागलंय.

....अमोल

Sunday, February 6, 2011

किनारा.......... लाटेची वाट पहाणारा!!

जातानाचे ठसे होते चार पाऊलखुनांचे ,
येतानाच्या केवळ दोनच होत्या त्या वाळूत,
मी अनुभवलंय ! सागर सारं काही सामावून घेतो.

ओले चिंब अंग विरघळत होते,
समुद्राच्या खारट पाण्यात त्या,
अंगाबरोबर आनंद कधी विरघळला कळलंच नाही.

त्या दिवशीही लाटे सारखाच आवेग होता,
छातीशी येऊनही  धरता आला असा तो क्षण होता,
किनाऱ्याच दुखं मला त्या दिवशी कळलं होतं.

माझं सारं काही त्या लाटेने वाहून नेलं,
सावळीशी मखमलही तळहातावरना तेव्हाच गेली,
लाज सांभाळणारी चुनर केवळ होती माझ्या निर्लज्जपणासाठी.

मी भूतकाळ विसरत चाललोय,
पण ते क्षणच मला विसरत नाहीयेत,
म्हणून तर ते भेटायला येतात आठवण बनून.

किनाऱ्यावरची वाळू अजून दोन परतीच्या पावलांचा हिशेब मागतेय,
त्या दिवसापासून न तेवलेल्या दिव्यांचा सांज जाब विचारतेय,
मी काय करू? काही प्रश्नांना उत्तरच नसतात.

रित आहे संद्याकाळी सूर्यास्त होण्याची,
माझातर चंद्रही तेव्हाच मावळला होता,
दोन अंधार झालेले! एक पुसला गेलाय, एक अजून रुसलाय.

ते म्हणतात कि देव ऐकतो, मी हि हाक मारलेली,
म्हणतात त्याच्या घरी देर आहे, अंधेर नाही,
पण आता मला काय करायचंय.

.....अमोल