Saturday, July 2, 2011

तुझं तुलाच सावरायला हवं

फार मौल्यवान आहे तुझ्या अब्रूची ठेव,
म्हणून म्हणतो तुझं तुलाच सावरायला हवं.

आता किती वाट बघशील कि कोणीतरी येईल,
तूच कर काहीतरी नाहीतर उशीर होईल.
बेछूट जनावरांनी भरलंय हे सारं गावं.

तुझ्या शिलाच रक्षण तुलाच आता करायचंय,
या वासनेच्या जंगलात तुलाच आता तरायचंय.
तुलाच आत्मसाद करायचंय लढण्यासाठी बळ नवं.

तुला आता कळायला हवा स्पर्शाचा अर्थ,
आणि कळायला हवं मन नजरेतून पुरतं.
तू फसायचं नाही जरी किती टाकले त्यांनी डाव.

धन्य होती द्रौपदी जिला लाभला श्रीक्रिष्ण,
पण प्रत्येकाचं नशीब असतं भिन्न भिन्न.
आताच्या युगात प्रत्येकवेळी कसा धावेल देव.

डोळे उघडून चालआंधळ्यासारखे वागू नकोस,
खरचटलंलागलं तरी आधार उगी मागू नकोस.
सहानुभूतीच्या मुखवट्याखाली करतील वेगळाच बनाव.

सहवास आणि प्रेम यातलं अंतर जाणून घे,
आयुष्याचा मार्ग वारंवार तपासून घे.
काळजीपूर्वक वागण्याचा लावून घे सराव.

स्वाभिमान काय असतो हा खरा जाणून घे,
करारीपणाचे लक्षण स्वतः अंगी बाणून घे.
तुझ्या शरीराकडे नजर लावून बसलंय कुणी भडवं

तुझ्या वागण्याकडे आहेत बरेच चष्मे वर,
त्या आंबट जिभेला लागतंच कुणाचं तरी लक्तरं.
त्यांना किती जवळ करायचं हे सुद्धा तूच ठरव.

बेधुंद वागावं वाटेलही पण जरा आवर घाल,
उंच उडणाऱ्या पाखरासाठीच त्यांनी पसरवलेत जाळ.
म्हणून खऱ्या विश्वासाचा सर्वप्रथम घे तू ठाव.

आपण राहतो तो समाज सर्व घटकांचा बनलेला असतो,
नीतीवानांसोबत अनियातीचा राक्षसही इथेच वसतो.
स्वताही काही बंध पाळण्याचा पक्का कर ठराव.

तू स्वयंभू आहेस स्वतःचं  जीवन जगण्यासाठी,
शिक्षणाचा आधार घे अन्यायाशी लढण्यासाठी.
ओळख स्वतःला पुरतं, करू नकोस तोंड रडवं.

तूच ठरवून घे तुझ्या पटावरले सोबती,
उगाच नको वाढवू अनोळखी नाती.
स्वरक्षणाची शिस्त स्वतःच स्वतःला लाव.


......अमोल

No comments:

Post a Comment