Thursday, September 2, 2010

“आई”स्क्रीम

काल मला यायला फारच उशीर झाला.
विरघळलेला आईस्क्रीम तुला एकटीलाच खावा लागला.
आयुष्यातही बरेचसे आनंद तुला विरघळल्यानंतरच भेटलेत.

दिसभर राबणाऱ्या तुझ्या हातांना मी बघतो.
तुझ्या चेहऱ्यावरच्या विरलेल्या आनंदालाही मी बघतो.
सकाळी उठल्यानंतर आसवानी भिजलेल्या उशीलाही बघतोच मी.

तुझ्याही मनात ईच्छा आकांक्षा होत्याच असतील.
मला वाटत मीच साखळी झालो असेन तुझ्या पायाची.
अमावसेला चंद्र आकाशातच असतो, न उगवण्याच वचन आहे म्हणे त्याच.

तुझ्या एकटेपणात तुझ्याशी बोलणारे कुणीच नव्हते.
पण जागोजागी तुला बोलणारे अनेकजण होते.
तुझी चूकच मला अजून कळली नाहीयेय.

माझ्या प्रत्येक जखमेवर तूच औषध आहेस.
पण तुझ्या सर्व जखमा मला कधीच दिसल्या नाहीत.
एका नजरेत पूर्ण सागर बघणे कठीण आहे.

आज तू किती निछींत झोपलीयेस एका अर्भकासारखी.
या आधी झोपतानाही उठण्याची चिंता असायची.
मरणात इतकी शांती असते हे माहित असत तर पहिले थांबवलंच नसत.

तू फार धन्य आहेस, तरी पुढल्या जन्मी तुझ्या पोटी मी नाही येणार.
उगाच कशाला त्या गर्भातल्या, प्रसुतीच्या आणि त्यापेक्षाही वाढविण्याच्या कळा.
त्यापेक्षा तूच माझी घरी जन्म घे, बरीच सेवा राहिलीय अजून.

......अमोल राणे

तरुणाई

हेच ते वय असतं,
जिथे कुणाचं भय नसतं.
मोकळी असते स्वप्नातली वाट,
आणि कल्पनाही असते स्वस्त.

नको असते उंच शिखर,
छोटंसं टेकाड पुरेसं असतं.
मन भरून गप्पा मारायला,
जर कुणी असेल मस्त.

याच त्या वयामध्ये,
विश्रांतीला नसतो वेळ.
उमेदीच्या गावावारती,
प्रयत्नांची असते गस्त.

हेच तर ते वय असतं,
जिथे नेमकं मन फसतं.
नजरेतले कळता भाव,
लाडे लाडे गाली हसतं.

नेमकी याच वयात,
कुणी लिहिली ज्ञानेश्वरी,
किंकाळी फोडण्या दिल्ली दरबारी,
कुणी होते पुरे व्यस्त.

याच त्या कोवळ्या वयी,
देशासाठी स्वीकारली फाशी,
कुणी वाचवण्या आपली झाशी,
भय फेकुनी कंबर कसत.

हेच ते वय असतं,
जिथे मन आपलं नसतं.
इथे नेमकी चुकते वाट,
कुणा नेमकं गाव गवसतं.

इथे ना चुकीला शाप असतो,
ना कधी पश्चाताप असतो.
येईल ते भोगण्याला,
इथे खुलं दार असतं.

याच वयात आयुष्याचा,
नेमका लागतो डाव जुगारी.
हुकमी पण नसतानाही,
उद्यासाठी पानं पिस्त.

बेपर्वाई वागण्यात असते,
पण आदर्शांना नसतो विसर.
उनाडकीच्या पंखाखाली,
निरागसतेचं पाखरू वसत.

.......अमोल राणे