Saturday, January 22, 2011

स्वर व्याकूळतिचा

असा कधीही ऐकला नाही स्वर व्याकूळतिचा,
दिनकर माध्यानी असता किरण असा मावळतीचा.

भय अस्मानी लाटांचे पैलतीरावर होते,
बेभानपणाचे सूत्र माझ्या शिरावर होते,
वारयाशी अडले नाही शीड माझे कधीही.
वल्हवली नाव सदाच मार्ग विसरून परतीचा.

अडवती मज तेव्हा फास खूप मोहाचे,
हृदयस्पर्शी होते भास सभोवाचे,
मी गुंतलो त्या स्वार्थी स्वप्नात केव्हाही.
आकाश गवसण्या तेव्हा गंध विसरलो मातीचा.

ती रात अंधारी आणि वादळ भयावह होते,
पण जिद्दीने जगण्याचे ते माझे वय होते,
लाटान्नाही चिरले त्या धाउनी आल्या जेव्हाही.
लढलो परी रडलो केला सामना त्या रातीचा.

नव्हता रात्रीस तेव्हा दीपस्तंभ उजळणारा,
त्या पाण्यात होतो एकटाच मी जळणारा.
व्यथा तेव्हा माझी ना विचारली कोणीही.
एकू दिला मीही कोणास स्वर माझा काकुळतीचा.

आपलेच होते आधी तोडण्यास आधार,
निंदेस जोर होता लाऊन जिभेस धार,
यशाने पैलतीरावर जाता तेच ओवाळती मज तेव्हाही,
परी जीव रडत होता वरीवरी त्या हसणाऱ्या वातींचा

अमोल

Saturday, January 15, 2011

तुझ्यामुळेच

व्यथित माझ्या भावना,
तुझ्यासमोर कथित झाल्या.
ऐकायला तू होतास म्हणूनच,
त्या साऱ्या श्रुत झाल्या.

चिरंतर होत्या वेदना माझ्या,
नि चिरंतर होते दुखं सारे.
तू आलास जीवनात म्हणूनच,
वेदनाही अमृत झाल्या.

मी भोळी होते गुंतलेली,
नि गुरफटलेली स्वतःतच.
झिडकारल्या अस्तित्वाच्याही कळ्या,
तुझ्यामुळेच स्वीकृत झाल्या.

आकृत पावली स्वप्ने सारी,
सुखावली लोचने हि.
कोमजलेपण दूर सारून,
पाकळ्या फुलण्या प्रेरित झाल्या.

एकली होती सावली मी,
तुझी प्रिया साथ झाली.
तू दिलास हातात हात नि,
संचिताच्या घागरी ओतपोत झाल्या.

माझ्या खुळीच्या कल्पनांना,
कधीच परवानगी ना  मिळाली.
तुझं मांगल्याच लेणं लेऊन,
त्या साऱ्या अधिकृत झाल्या.

आज तूझा विश्वास आहे,
तूच माझा श्वास आहे.
शोकांतिका सरून साऱ्या,
घड्या जीवनाच्या कृतकृत्य झाल्या.

भीती नाही कसली मला,
फिरायला चारचौघात.
तुझी साथ आहे मला,
ह्या गोष्टी सर्वश्रुत झाल्या.

......अमोल

हळवीशी व्याकुळता

नात्याविरहित  आपुलकीचा,
हात जेव्हा झाला मिळता.
सहजच आली ओठांवरी,
हळवीशी व्याकुळता.

लाटेचे कधी नव्हते भय,
पण हरवण्याचे होते वय.
मोह झाला चांदण्यांचा,
नि पडली खुळी चांदणसय.
किनारयावरच तोल गेला,
विश्वासच अबोल झाला.
ऐन पहाटेच्या दाराशी,
मोगरयाचा मोल गेला.
परी बोलले कुणाशीही,
ना कुणा सांगितली व्यथा.

केव्हापासून चालते आहे,
मौन वेडे पाळते आहे.
प्रश्नार्थक चेहऱ्यांची.
नजर सदा टाळते आहे.
ज्ञानेश्वरी वाचणारे,
म्हणती मज हिज अध्याय.
एक हाती वाजे टाळी,
हाच एक मानती न्याय.
विश्वासात आंधळीची,
कशी सांगू मी कथा.

सुगंधाचा उत्सव आला,
तरी फुलले ना मी कळी.
भय स्वप्नातही दाटते,
फुलण्या पाकळी पाकळी.
हा हि ऋतू वाया गेला,
नि पुढचेही जातील वाया ऋतू.
आशा मनी कोणती,
आहे केवळ एक हेतू.
खुडावी ना कळी कोणती,
फुल तिचे होता होता.


......अमोल

Friday, December 31, 2010

नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

लागली चाहूल नव वर्षाच्या आगमनाची,
जुने विसरून सारे धावणारी आशा मनाची.
रोज तेच जीवन, तीच नाती,
तीच नोकरी, तेच साथी.
पण तरी असतात मनी विश्वासाचे दोर हाथी,
याच विश्वासाने जगायची असते  कंटाळवाणी घडी जीवनाची.
कधी थकवा जाणवतो, क्षीण येतो सार्यांचा,
आणि मनात जाळ उठतो मग जुन्या आठवणींचा,
ती केलेली मजा, एकत्र घालवलेले क्षण,
कधी हसत गेलेले, कधी फिस्कटलेले क्षण,
आणि हेच पुन्हा चेतना  देतात नव काही जगण्याची.
जुनं वर्ष गेलं तसं पुढलही जाईलच.
आणि शांत आपण बसल्यावर एकदा तरी सर्वांची आठवण येईलच.
आता जरी आहोत आपण नव्या आयुष्याच्या  वळणावरती,
तरी देवा कडे एकच विनंती न विसर पडू दे आम्हा एकमेकांचा कधी,
आस मनात ताजीच असावी एकमेकांना भेटण्याची.


नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

अमोल

Tuesday, December 21, 2010

ओढ

कोणतीही ओढ लागली या मना,
येणाऱ्या वाटेकडे पाहतो हा कुणा,
बदललेले भाव सारे बदललेल्या संवेदना,
बदललेले विश्व मनीचे बदलल्या खुणा,
भांबावते मन राहत नाही भाना,
कळते तुला जरी मलाही सांगना.

अलगद निसटून जातो मुठीतून माझ्या,
अलवार शिरू पाहतो मिठीत कुणाच्या,
नव्हत्या अश्या तऱ्हा पूर्वी या मनाच्या,
नव्हत्या अश्या कधीच अधिरश्या, बेभानश्या.

अजानते स्वर, अजानते हे सूर,
हि सरगम हि नवीनवेली फुलते वेळीअवेळी,
रूप हि अजानते केवळ फसवे भास हे,
फुलल्या तरी मनी या किती अबोली...... किती चमेली.

हा वेगळा अनुभव आहे हि वेगळी प्रचीती,
पुसटसे बिंब केवळ उमटते चित्ती,
नावही नसे ठावे, ठाऊक नसे कि कोण आहे,
पण माझ्या एकांतात केवळ त्याची खुमार राहे.

त्याची हि अवस्था होते का अशी,
तोही झुरतो का रोज अधीर मनाशी,
होईल भेट जेव्हा कळेल का त्याही,
कि आहोत जवळीच आणि भेटही होत नाही.

हीच जाग सदा होते अंतरी,
मी नाही एकटा सोबत आहे कुणीतरी,
भेट होईल आज वा उद्या ना तरी,
भेटतील हे दोन जीव या प्रीत सागरी.

......अमोल

Thursday, December 16, 2010

बिझी बाबा

बालपणीच्या व्यथा:

तुला कधी भेटलाच नाही का रे  वेळ माझ्यासाठी,
आणत राहिलास फक्त नवे नवे खेळ माझ्यासाठी.

आईच्याच पदराची सदा होती माया माझ्यावरी,
तू दिसभर खंगून जमवत होतास मरगळ माझ्यासाठी.

बघ आठवतं का कधी घेतलस मला खांद्यावरी,
घरी आलास का संध्याकाळी कधी सरळ माझ्यासाठी.

पुरवत होतास सारं काही चुकता बेहीशेबही,
मिरवाव खांद्यावरून कधी वाटली का तळमळ माझ्यासाठी.

मी बसून असायचो लाऊन आस, सांजेला दाराकडे,
पण नीट बघायलाही नसायचं तुझ्याकडे बळ माझ्यासाठी.

जाणीवेच्या उंबरठ्यावर:

आता मला सवय झालीय तुझी असूनसुद्धा नसण्याची,
पण टोचते मनात तू भोगलेली हर कळ माझ्यासाठी.

मी फिरतो आता वाटेवरी फुलांच्या मखमालींच्या,
सावलीत ठेऊन मला, सोसलीस उन्हाची झळ माझ्यासाठी.

 निर्वाणीच्या वेळी :

तुझ्याशी खूप बोलायचंय, तुझही खूप ऐकून घ्यायचय,
निदान भांडण्यासाठी तरी काढना एक संध्याकाळ माझ्यासाठी

मला आता पंख फुटलेत, तुझी शरीरही शांत झालंय,
मोकळ्या आभाळात जाणवते तू सहन केलेली होरपळ माझ्यासाठी.

.......अमोल